कोहलीच्या ९००० धावा पूर्ण   

लखनौ : लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात दिलेल्या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीनं आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. लखनौ विरुद्धच्या सामन्यात २४ धावा करताच कोहलीनं आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून ९००० धावांचा टप्पा पार केला आहे. 
 
टी-२० क्रिकेटमध्ये एका संघाकडून एवढ्या धावा करणारा कोहली पहिला खेळाडू आहे. विराट कोहली २००८ च्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग आहे. कोहली मैदानात उतरला की, एखादा विक्रम घडलाच असे काहीसे चित्र गेल्या काही वर्षांपासून त्याने निर्माण केले आहे. त्याची आणखी एक झलक आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यात पाहायला मिळाली.
 
लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहलीनं आयपीएल आणि चॅम्पियन्स टी-२० लीग स्पर्धेत मिळून आरसीबीकडून २७० डावात ८९७६ धावा केल्या होत्या. यात २४ धावांची भर घालत कोहलीनं मोठा विक्रम आपल्या नावे केला. २७१ व्या डावात त्याने ९००० धावांचा टप्पा पार केला.अन्य कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. आगामी काळातही कोणी हा विक्रम मोडीत काढेल असे वाटत नाही.
 
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात १२ सामन्यातील १२ डावात कोहलीनं ६०.८८ च्या सरासरीनं ५४८ धावा केल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीच्या ६ फलंदाजांमध्ये आहे. लखनौच्या संघाने मिचेल मार्शच्या अर्धशतकासह कॅप्टन रिषभ पंतने केलेल्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर बंगळुरुच्या संघासमोर २२८ धावांचे   टार्गेट सेट केले आहे. विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना त्याच्या भात्यातून मोठी खेळी अपेक्षित आहे.

Related Articles